LIVE : मुंबईला रेड अलर्ट... शहरासह उपनगरात पावसाचा जोर ओसरला - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, October 15, 2020

LIVE : मुंबईला रेड अलर्ट... शहरासह उपनगरात पावसाचा जोर ओसरला

 मुंबई - मध्य महाराष्ट्र झोडपून काढल्यानंतर पावसाने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. मुंबईमध्ये बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री 12 वाजल्यापासून विजेचा कडकडाटासह शहरातसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज दिवसभर मुंबईसह कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून आज सकाळी 7 वाजेपर्यंत शहरात 105.92 मि.मी. तर पूर्व उपनगरात 69.18 मिमी, पश्चिम उपनगरामध्ये 58.24 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत पावसाने उसंत घेतली आहे. तर काही ठिकाणी रिमझीम पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रात्री किंग सर्कल, सायन, हिंदमाता दादर आदी सखल भागात पाणी साचले होते.

कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राकडे सरकत आहे. अरबी समुद्रात त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच दक्षिण गुजरातच्या किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आला आहे. याच बरोबर पुढील १२ तासात मध्य महाराष्ट्रा ताशी 20 ते 30 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सध्या अतिवृष्टी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र यासह मुंबई कोकणात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे शहरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस बरसला, त्या प्रमाणे मुंबईतही रात्री 8 वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत कुठेही अद्याप पाणी साचल्याची नोंद नाही. रात्री 8 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत शहर विभागात 24.24 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 19.74 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 12.27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसह उत्तर कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट तर रायगड मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याचबरोबर मुंबईतील पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान राज्यात सगळीकडेच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बहुतांशी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी नदी काठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


Post Top Ad

-->