नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती वाढत आहे. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे शासन स्तरावरून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोना संसर्ग सुरक्षा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.
कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात भविष्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने आपली तयारी ठेवण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, प्रशासनाने रूग्णसंख्या वाढ लक्षात घेता बेड, ऑक्सिजन पुरवठा, औषधी पुरवठा आदींची सज्जता ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नये. ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था करून ठेवावी. येणारे दोन महिने जिल्ह्यासाठी चिंतेचे असून या परिस्थितीवर समन्वयाने मात केल्या जाईल. गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
ते पुढे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा. नियमानुसार पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी कालमर्यादा ठेवावी. तपासण्यांचा वेग कमी होवू देवू नका. याप्रसंगी जिल्ह्यातील टाळेबंदीबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले.
मरण दारी आणि तोरण दारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लोकांना सांगून देखील लोक ऐकत नाही, नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्ह्यात किमान 15 दिवस लॉकडाऊन करावा लागेल असे मत सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले. त्यानुसार पालकमंत्री यांनीदेखील नागरिक अशाचप्रकारे नियमांचे पालन करीत नसतील, तर लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा यावेळी दिला.
कोविड नियंत्रणासाठी लसीकरणाची गती वाढवा
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविड नियंत्रणासाठी विविध उपाययोजना शासनाने केलेल्या आहेत. सध्या कोविड नियंत्रणासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. नियमानुसार पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करण्यासठी लसीकरणाची गती वाढवावी , अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज सिंदखेड राजा ग्रामीण रूग्णालयात आयोजित बैठकीत दिल्या.
बैठकीला तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार जयवंत सातव, आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बनसोड, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, गटविकास अधिकारी देव गुन्हावत आदी उपस्थित होते.
परिसरात रूग्ण आढळून येत असलेल्या गावांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, ज्या गावांत रूग्ण आढळून येत आहे त्याठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या. तसेच रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात. गृह विलगीकरणातील रूग्णांवर लक्ष ठेवावे. तसेच गावागावात लसीकरण करण्यासाठी यंत्रणांनी सामूहिक प्रयत्न करावे. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.