बारामतीच्या लता करे यांच्यावर आधारित चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार.
नागपुर:लता भगवान करे एक संघर्ष गाथा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला. मूळच्या बारामतीच्या आणि ज्येष्ठत्व येऊनही पतीच्या आजारावरील औषधोपचारासाठी अनवाणी धावून मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिध्दी झाल्या आहेत. त्यांच्यावर एक चित्रपट तयार करण्यात आला आणि त्याला थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला…हे सगळेच एखाद्या चित्रपटाच्या कथानकात घडते तसेच घडले.
प्रसिध्दी व मानसन्मान मिळूनही आजही लता करे यांचे पाय जमिनीवरच आहेत आणि त्या मूळ जीवन जगत आहेत याचा आवर्जून उल्लेख करायला हवा.. अत्यंत संघर्षात जीवन जगणा-या मुळच्या बुलढाण्याच्या व नंतर बारामतीतच जीवनप्रवास सुरु ठेवणा-या लता करे यांचा जीवनप्रवास हा अनेक महिलांप्रमाणेच खाचखळग्यांचाच होता.
पती आजारी पडल्यावर एका मॅरेथॉनची जाहिरात वाचनात आल्यावर त्यातील बक्षीसाच्या रक्कमेने आपण पतीवर उपचार करु असे वाटून, त्या मॅरेथॉन धावल्या. अनवाणी आणि नऊवारी लुगडे नेसून धावणा-या लताबाईंची दखल प्रसिध्दीमाध्यमांनी घेतल्यानंतर रातोरात त्या स्टार बनल्या. त्यांची कहाणी ऐकून नवीन देशबोनाई यांनी त्यांच्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात खुद्द लताबाईंनीच भूमिका करावी असा आग्रह धरला.
अभिनयाची काहीही माहिती नसणा-या लताबाईंनी मॅरेथॉनमधील जिद्दीप्रमाणेच अभिनयातही काहीतरी करुन दाखवू या उर्मीने हो म्हटले आणि त्यांच्यावरचा चित्रपट त्यांनीच भूमिका साकारुन पूर्णही केला. यातही पती भगवान करे व मुलगा सुनील करे यांनीही छोट्या भूमिका साकारल्या आणि त्याच चित्रपटाला आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.