राज्यातील रेस्टॉरंट लवकरच सुरू होण्याची शक्यता.. राज्य सरकार जाहीर करणार नियमावली - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, September 28, 2020

राज्यातील रेस्टॉरंट लवकरच सुरू होण्याची शक्यता.. राज्य सरकार जाहीर करणार नियमावली



मुंबई - राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती निश्चित झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहेत. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक करून सुरू करत आहोत. त्यामुळे त्यांच्याकडून कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे. म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी.. तशीच तुमचीही..
राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायिक ही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेऊन सुरु करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी एसओपी (सामान्य कार्यप्रणाली) तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही.

जीवनशैलीत बदल करणे आवश्यक -
मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.

एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करा -
कोरोना विषाणूने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो, जी बाब गंभीर आहे हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन यात सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.

Post Top Ad

-->