‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही लोकचळवळ व्हावी - यशोमती ठाकूर - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, October 14, 2020

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही लोकचळवळ व्हावी - यशोमती ठाकूर


अमरावती
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या विचाराचे एका लोकचळवळीत रुपांतर व्हावे, अशी अपेक्षा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील जनतेच्या समृद्धीसाठी सर्व यंत्रणांनी काम करावे असंही त्या म्हणाल्या. अमरावती जिल्ह्यात ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ बाबतचा आढावा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, यावेळी मेळघाटातील बांबू लागवडीतून चांगेल उत्पन्न मिळवणाऱ्या राहू गावाचा उल्लेख यशोमती ठाकूर यांनी केला. त्या म्हणाल्या की एक गाव अशा पद्धतीने आपली प्रगती करु शकत असेल तर इतर गावेही नक्कीच आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग केल्यास समृद्ध होऊ शकतील. यासाठी स्थानिक परिस्थिती, हवामान आणि क्षमतांचा विचार करुन पिके निवडली पाहिजेत. त्यासाठी रोजगार हमी योजना, कृषी विभाग आदी विभागांनी समन्वयाने काम करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि आवश्यक ती मदत पुरवावी. राज्यासाठी पथदर्शी अशा पद्धतीने अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही संकल्पना राबवून यशस्वी करावी.

या बैठकीला जलसंधारण व रोजगार हमी योजनाचे प्रधान सचिव नंद कुमार, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हास्तरावरील तसेच तालुकास्तरावरील संबंधिक कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Post Top Ad

-->