निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत. परतीच्या पावसाने आता थोडासी आलेला घास हिरावला शेतकऱ्याची दाणादाण:
मेहकर तालुक्यातील हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली डोणगाव. गत आठ दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे. तर 26 सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पाण्यात हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली आले. तर कापणी करून ठेवलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांना वर्षानुवर्षापासून संकटात टाकत आहेत. निसर्गाच्या या लहरीपणातून सुटका करण्यासाठी यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी लवकर येणारी सोयाबीन वाणाची पेरली केली होती. सोयाबीन सोंगणी करताना परतीच्या पावसाचा सामना करायला लागू नये , हा उद्देश लवकर येणारे वान पेरण्या मागचा होता.मात्र निसर्गाने आपला लहरीपणा दाखवत यावर्षीही सोयाबीन पिकाला आपल्या कचाट्यात घेत शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले आहे. यावर्षी सोयाबीन सोंगनीला येताच परतीच्या पावसाने हजेरी लावत पाणीच पाणी झाले आहे. गत आठ दिवसापासून दररोज होत असलेल्या परतीचा पावसाने जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. दि.26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता प्रचंड प्रमाणात व ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने या पावसात सोंगलेलं सोयाबीन वाहून गेले आहे. तर कुठे वाळलेल्या सोयाबीन शेतात पाणी तुंबले आहे.तर पपई, संत्रा पिकाचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून पिक विमा कंपनीने कोणतेही निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांना तात्काळ विम्याचा लाभ द्यावा, तसेच शासनाने ही कोणतेही निकष न लावता सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे
चार एकरातील पपई नेस्तनाबूत डोणगाव येथील गजानन सखाराम पांडव या शेतकऱ्याने 4 एकर पपई ची लागवड केलेली होती. गत आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने व गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या पावसाने त्यातील बहुतांश झाडे पडली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखोचे रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील बागायती व फळबागा पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याने या नुकसानेची भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते.
सध्या कुठे आणि कधी किती पाऊस पडेल याचा नेम नाही, अशातच 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान मेहकर तालुक्यातील जानेफळ, डोणगाव, गोहगांव, शेलगाव देशमुख, पांगरखेड, कणका या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात अनेक शेतकऱ्यांनी काही शेतात सोंगून ठेवलेली सोयाबीन वाहून गेली. तर काही ठिकाणी वाळलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी तुंबले ज्याने त्याचे नुकसान झाले. त्याचबरोबर फळबाग, भाजीपाला, पपई सारख्या बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.