( छायाचित्र संग्रहित )
प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नाही, आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेणार : अजित पवारनागपुर:-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल, राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, “आज पुण्यात बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही. आज बारामतीत बैठक घेऊन इंजक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. बारामतीत होत असलेली वाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलिस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत”
रेमडिसीव्हरचा तुटवडा नाही
राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये इंजक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल पुण्यातील बैठकीत निर्णय घेणार आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं
व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर चर्चा
आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं
सर्वपक्षीय बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , मनसे अध्यक्ष राज ठाकरे , चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे.