"गरज ही शोधाची जननी आहे" असे म्हणतात ते उगीच नाही. मानवी गरजातुनच आजतागायत विविध शोध जगासमोर आले आहेत. अनेक शोध लावलेल्या आपल्या भारत देशात टॅलेंटची कमी नाही. वाशीम जिल्ह्यातील पिंप्री अवगण या गावात अशाच एका रॅंचोने देशी जुगाडातुन टाकाऊ वस्तुचा उपयोग करून गावातील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न सोडविला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या या गावाच्या जवळच्या परिसरात नेटवर्क टॉवर नसल्यामुळे गावात मोबाइलला रेंज मिळत नव्हती. गावातच नेटवर्क नसल्यामुळे घरात मोबाईलला नेटवर्क मिळण्याचा प्रश्नच नव्हता पर्यायाने विद्यार्थी ऑनलाईन अध्ययन करु शकत नव्हते. यावर मात करण्यासाठी गावातील संदीप अवगण यांनी घराच्या छतावर स्टिलच्या दोन प्लेट लाकडी बांबुत लावल्या. स्टिल प्लेटला डिश टीव्हीचा वायर जोडून तो घरात मोबाईलजवळ लावला. आश्चर्य म्हणजे शून्य नेटवर्क असलेल्या त्यांच्या घरात या कल्पनेने पूर्ण नेटवर्क आल्याचे दिसून आले.
वाय फाय तंत्रज्ञानातुन अवगत झालेली ही कल्पना अवगण यांनी मोबाईलचा नेटवर्क वाढवण्यासाठी वापरल्याने गावातील नेटवर्क प्रश्न तात्पुरता मिटलेला आहे मात्र गाव परिसरात नेटवर्क टॉवर उभारल्यास हा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल अशी आशा गावकऱ्यांना आहे.
दरम्यान, पिंप्री अवगण येथील ९०% घरावर नेटवर्क वाढवण्यासाठी स्टील प्लेटचे हे नवीन तंत्रज्ञान पाहावयास मिळते.
दरम्यान गावाच्या नावात जरी अवगण असले तरी विविध गुणांनी भरलेल्या या गावकऱ्यांच्या भन्नाट कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.